कोल्हापूर • प्रतिनिधी
मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना केडीसीसी बँकेत विमा रक्कमेच्या धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बैठकीत हे वितरण झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, बँकेने किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत २०२० – २०२१सालाकरिता भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीशी करार करून अडीच लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा उतरविला होता. तसेच बँकेने २०२१-२०२२ सालाकरिता इफ्को टोकियो इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्डधारक अडीच लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख विमासुरक्षेचा विमा उतरविला आहे. विमा हप्त्याची तोशिस शेतकऱ्यांना लागू न देता बॅंकेने ही रक्कम नफ्यातून भरली आहे. आत्तापर्यंत मृत शेतकर्यांच्या वारसांना सव्वा कोटीहून अधिक विमा रक्कम मिळाली आहे.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा केडीसीसी बँकेचा आत्मा आहे. शेतातील कामे करताना सर्पदंश, विजेचा धक्का, औषध फवारणी अशा कारणांमुळे तसेच अपघाताने शेतकऱ्यांचे दुर्दैवी मृत्यू होत असतात. अशा संकटग्रस्त परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना हातभार लागावा म्हणून बँकेने प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपये विमासुरक्षेची योजना सुरु केली आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीत गजानन कांबळे – कोलीक, इंदुबाई पाटील – पाटेकरवाडी, मनोहर पाटील – खोकुर्ले, अविनाश पाटील – धुमडवाडी, ज्योतिबा शिंदे – तडसिनहाळ, अजित शिंदे – हणमंतवाडी, दिपक पाटील – हाजगोळी, दिनकर पाटील – उत्रे या मृतांच्या वारसदारांना धनादेश देण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आ.राजेश पाटील, माजी खा. श्रीमती निवेदिता माने, माजी आ. अमल महाडिक, ए. वाय. पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, सुधिर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ स्मिता गवळी आदी संचालक उपस्थित होते.