• राज्यातील ३५० किल्ल्यांबाबत चर्चा
कोल्हापूर • प्रतिनिधी
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता मेन राजाराम कॉलेज, भवानी मंडप येथे ऐतिहासिक दुर्ग परिषदेचे आयोजन केले आहे. याअंतर्गत राज्यभरातील ३५० हून अधिक किल्ल्यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. दुर्ग संवर्धनाशी निगडित २२५ संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावर दुर्ग परिषद घेतली होती. त्यानंतर होणाऱ्या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडांबाबतची माहिती आदींबाबत ऊहापोह होणार आहे. दुर्ग संवर्धनाबाबत महत्त्वाचे निर्णय होणार असून खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत महत्त्वाचे ठरावही केले जाणार आहेत.
यौराज शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होईल. दुर्ग परिषदेदरम्यान संयोगीताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून राज्यातील विविध प्रकारच्या जलदुर्ग, भुईकोट किल्ले, वनदुर्ग यांची माहिती एकत्रित करून ती मोबाईल ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने संकलित केली जाणार आहे. त्यासाठी उपस्थित प्रत्येक दुर्ग अभ्यासकांकडून माहिती गोळा केली जाणार आहे.