![]() | ![]() ![]() ![]() ![]() | ||
कोल्हापूर • प्रतिनिधी
महाराष्ट्रात २०० एकर जागेत ‘इलेक्ट्रॉनिक्स पार्क’ उभारल्यास हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रातील कंपन्या एकत्रित कार्य करू शकतील व एका पार्कच्या माध्यमातुन नवीन ३०० उद्योग उभारले जातील यासाठी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रो अॅण्ड एज्युकेशन (वेसमॅक) ने पुढाकार घ्यावा. केंद्र सरकारच्यावतीने त्यासाठी आवश्यक ते सहकार्य प्राधान्याने करू असे आवाहन शिक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.
‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर’ चे अध्यक्ष ललित गांधी व अन्य पदाधिकार्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी विशेषतः कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात आय.टी.पार्क उभारण्याच्या केलेल्या मागणीसंबंधी नवी दिल्ली येथे मंत्रालयात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
केंद्र शासन पुरस्कृत प्रत्येक जिल्ह्यात आय.टी.पार्क उभारण्याची योजना बंद झाली असुन, व्यापक स्वरूपाची व सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही उद्योगांना सामावून घेऊ शकेल अशी ‘इलेक्ट्रॉनिक्स पार्क’ उभारण्याची नवी योजना केंद्राने पुरस्कृत केली असून महाराष्ट्रातील पहिला ‘इलेक्ट्रॉनिक्स पार्क’ उभारण्यासाठी ‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर’ (वेसमॅक) ने पुढाकार घ्यावा अशी सुचना त्यांनी केली.
नाम. संजय धोत्रे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या सुधारीत योजनेनुसार सदर २०० एकरमधील पार्क उभारणीसाठी, यातील पायाभुत सुविधांच्या विकसनासाठी केंद्र सरकारतर्फे १४० कोटी रूपयांचे अनुदान व सामायिक सुविधा केंद्र निर्मितीसाठी ७५ कोटी रूपयांचे अनुदान या प्रकल्पासाठी मिळू शकेल.
‘वेसमॅक’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी, मंत्री महोदयांच्या या प्रस्तावाचे स्वागत केले व चेंबरतर्फे आवश्यक ती कार्यवाही पुर्ण केली जाईल असे सांगुन सुमारे ३००० कोटी रू. ची नवी गुंतवणुक २५० उद्योगांच्या माध्यमातुन येणार्या या पार्कमुळे ५००० हुन अधिक युवकांना थेट रोजगाराच्या संधी मिळणार आहेत ही बाब स्वागतार्ह असल्याचे सांगुन महाराष्ट्र सरकार व लोकप्रतिनिधिंचे सहकार्य घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
शिक्षण विभागाशी विषयांवर चर्चा करताना, ललित गांधी यांनी शिक्षण क्षेत्रासंबंधी ही विविध विषयांचे सादरीकरण केले.
यावेळच्या चर्चेत मंत्रालयातर्फे केदार बुरांडे, चेंबरतर्फे संदिप भंडारी, जे.के.जैन यांनी चर्चेत सहभाग घेतला.