• ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास आश्वासन
कोल्हापूर • प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यात महापुरामुळे नुकसान झालेले व्यापारी व उद्योजक तसेच गेले वर्षभर कोरोनाच्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या राज्यभरातील व्यापाऱ्यांसाठी व छोट्या उद्योजकांसाठी केंद्र सरकारतर्फे विशेष आर्थिक पॅकेज देण्याचा प्रस्ताव तयार करू अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी वेस्टन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली.
महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई तसेच सवलतीच्या व्याजदरात विशेष कर्जपुरवठा यासह कोरोनासंबंधीच्या सततच्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या राज्यभरातील व्यापारी व उद्योजकांना केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळावे. एम एस एम ई च्या व्याख्येमध्ये समावेश केलेल्या व्यापारीवर्गाला कर्जाच्या वर्गवारीतील सवलतीबरोबर सरकारी पुरवठ्याच्या टेंडरमध्ये प्राधान्य, तसेच मालपुरवठ्याच्या बिलांच्या मिळण्याबद्दल होणाऱ्या दिरंगाईपासून कायदेशीर संरक्षण अशा विविध मागण्यांबाबत चर्चेसाठी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (वेस्मॅक) चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष संदीप भंडारी, संचालक जे.के.जैन, संग्राम गाडे यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे नारायण राणे यांची भेट घेऊन चर्चा केली.
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसारच्या व्याख्येत व्यापाऱ्यांचा समावेश केल्यानंतर याचा लाभ व्यापार्यांच्या पर्यंत पोचण्यासाठीची यंत्रणा उभारावी व व्यापाऱ्यांना उद्योग आधार नोंदणीसाठी मार्गदर्शन करावे अशी सूचना मंत्री नारायण राणे यांनी केली. चेंबरतर्फे लवकरच अशी सुविधा केंद्रे उभारली जातील असे ललित गांधी यांनी यावेळी सांगितले.