• सुळकुडमध्ये पाहणीसह साहित्य वाटप व पूरग्रस्तांशी चर्चा
कोल्हापूर • प्रतिनिधी
काहीही झाले तरी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. पूरग्रस्तांच्या प्रत्येक अडचणीच्या सोडवणुकीसाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे, असेही ते म्हणाले.
सुळकुड (ता.कागल) येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसह पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, प्रशासनाला मी याआधीच सूचना दिलेल्या आहेत. मातीच्या घराची एक भिंत जरी पडलेली असेल तर पंचनाम्यामध्ये त्याचा अंशतः, किरकोळ असा शब्दांचा खेळ न करता ते संपूर्ण घरच पडले, असा करा. कारण; मातीच्या घराची एक जरी भिंत पडली तरी संपूर्ण घरच नंतर ढासळते.
या गोष्टी कराव्याच लागतील…..
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महापुरामुळे होणाऱ्या विस्थापितांच्या समस्येवर कायमचे पुनर्वसन हाच तोडगा सुचविलेला आहे. पूरबाधित लोकांनी आपल्या घरादासह दुसऱ्या सुरक्षित जागेवर स्थलांतरित व्हावंच लागेल. विद्युत खांबांची उंची वाढवून त्याऐवजी टॉवर उभारावे लागतील, त्यासाठी निधीही देऊ. जॅकवेल महापुरात बुडल्यानंतर उंचवट्यावरील भागातील विहिरीतून पाईप लाईन टाकून पिण्याचा पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागेल.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, बापूसाहेब पाटील, एम. वाय. भिकाप्पा – पाटील, पंचायत समिती सभापती रमेश तोडकर, कृषी अधिकारी भिंगारदिवे, राजेंद्र माने, सरपंच सुप्रिया भोसले, उपसरपंच शरद धुळुगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत शिंदे, जलसंपदा विभागाच्या भाग्यश्री पाटील, तात्यासो वाणी, अरुण पाटील, क्रांतीकुमार पाटील, गोरख कांबळे, बाळासो पाटील, सुकुमार हेगडे, विजय पाटील, तलाठी अनिता कोळी, दादासो चवई, कलगोंडा पर्वते आदी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत दादासो चवई यांनी केले. प्रास्ताविक अरुण मुद्दाना यांनी तर आभार विकी पाटील यांनी मानले.