कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठाच्यावतीने ”सौजन्याची वारी आली आपल्या दारी ” या सामाजिक उपक्रमांतर्गत सौजन्य रथाचे उदघाटन विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ.अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एन.के.पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, प्राचार्य विराट गिरी, स्कुल ऑफ लिबरल आर्ट्सचे डीन डॉ.उत्तम जाधव, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे, आशिष कुलकर्णी, प्रोफेसर डॉ. एस. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले ” नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये संजय घोडावत विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहिले आहे. चेअरमन संजय घोडावत व सचिव श्रेणिक घोडावत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सौजन्य रथ आम्ही सुरु केला आहे. देणगीदारांकडून नवीन व जुने वापरण्यायोग्य कपडे, वस्तू, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, चप्पल, बुट, पर्स, खेळणी, इलेक्ट्रिकल साहित्य इ. संकलित करून ग्रामीण भागातील गरजू व्यक्तिपंर्यंत पोहचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरी या सामाजिक उपक्रमामध्ये परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या सर्व उपयुक्त वस्तू सौजन्य रथाकडे जमा केल्यानंतर हा सौजन्य रथ दुर्गम भागातील किंवा गरीब लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना देणार आहे असे आश्वासन या उपक्रमाचे समन्वयक प्रा.अजय कोंगे यांनी केले.
संजय घोडावत फौंडेशन नेहमीच समाजातील उपेक्षित घटकांना मदत करण्यासाठी तत्पर असते. फौंडेशनने आजवर अंधअपंग शाळा, पूरग्रस्त, अनाथालये, दुष्काळग्रस्त शेतकरी, वृद्धाश्रमे, शहीद जवानांचे कुटुंब, आरोग्यकेंद्रे, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय खेळाडू, गरीब गरजूंना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपले आहे. महापूर आणि कोरोना काळात फौंडेशनने उल्लेखनीय कार्य केले आहे