• निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप
कोल्हापूर • प्रतिनिधी
गोरगरीब सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जोपर्यंत या जनतेचे आशीर्वाद पाठबळ आणि परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कसलाही धक्कासुद्धा लागणार नाही, असेही ते म्हणाले.
कागलमधील बहुउद्देशीय हॉलमध्ये तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या २०० लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, विशेष सहाय्य मंत्री म्हणून काम करीत असताना ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत प्रभावीपणे राबविली. समाजातील विधवा, परित्यक्त्या, अंध, दिव्यांग, मंतीमंद आणि डोंगराएवढे दुःख असलेले ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक माझ्या डोळ्यासमोर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य कुंडलिक पाटील (रा.बामणी) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत समिती सदस्य सदाशिव तुकान यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार बस्तवडेचे माजी सरपंच साताप्पा कांबळे यांनी मानले.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार शिल्पा ठोकडे, सदाशिव तुकान, बाळासाहेब दाईंगडे, राजेंद्र आमते, सातापा कांबळे, शशिकांत खोत, संजय चितारी, विकास पाटील, प्रवीण सोनुले, विठ्ठल जाधव पैलवान रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.