कोल्हापूर • प्रतिनिधी
साहस हा पाया, ऐतिहासिक वास्तूंचे जतन हे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या हिल रायडर्स ॲडव्हेंचर फौंडशनतर्फे विजयादशमीनिमित्त जुना राजवाडा नगारखान्याच्या कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले.
करवीरनगरीच्या शौर्यशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जुना राजवाडा कमानीस गेली ३३ वर्षे सातत्याने विजयादशमीदिनी मंगलमय वातावरणात तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात येते. हीच परंपरा कायम राखत शुक्रवारी (दि.१५) विजयादशमीनिमित्त सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, विजय देवणे, सन्मती मिरजे आदी मान्यवरांच्या हस्ते नगारखाना कमानीस मंगल कलशाचे तोरण बांधण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले गेले. याप्रसंगी हिलरायडर्सचे प्रमोद पाटील, विनोद कांबोज, युवराज उर्फ बंडा साळोखे, सूरज ढोली, सागर बगाडे, चंदन मिरजकर, स्नेहल रेळेकर, जयदीप जाधव, शिवतेज पाटील आदींसह ‘हिलरायडर्स ‘चे शिलेदार उपस्थित होते.