सार्वजनिक समारंभ व शाळा ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी
• चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
महाराष्ट्रात राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये काही सुधारणा करून लग्न व अन्य सार्वजनिक समारंभामध्ये ५० टक्के क्षमतेने उपस्थितीसाठी तसेच शाळा व शैक्षणिक संस्था ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र चेंबरतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांच्या सचिवांना चेंबरतर्फे निवेदन देऊन यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या पालनासाठी आम्ही कटीबध्द आहोत. मात्र अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था सुरळीत चालु राहण्यात मदत होणेसाठी वरील दोन सुधारणांचे आदेश तात्काळ निर्गमित व्हावेत अशी अपेक्षाही ललित गांधी यांनी व्यक्त केली आहे.