कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जनतेला स्वस्त अन्नधान्य उपलब्ध व्हावे. इचलकरंजी शहराला अन्नधान्य इष्टांक वाढवून मिळावा यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडून उचित मार्गदर्शन मागवून घ्यावे आणि त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
इचलकरंजी शहराला अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वंचित कुटूंबियांना अन्न धान्याचा इष्टांक वाढवून मिळावा यासाठी ग्रामविकासमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली होती.
ते पुढे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याला इष्टांक (लाभार्थी संख्येचा कोटा) ठरलेला आहे. परंतु इचलकरंजी शहराची सद्यस्थिती लक्षात घेता हा कोटा वाढवून मिळावा, यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू.
तत्पूर्वी इचलकरंजी शहरातील वाढती लोकसंख्या गृहीत धरून सुमारे २३ हजार २५४ एवढा इष्टांक प्राधान्याने मंजूर होवून मिळावा यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडे मागणी केली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, न. पा. मुख्याधिकारी प्रदिप ठेंगल, मदन कारंडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.