• ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञतेची भावना कोल्हापूर • प्रतिनिधी आंबेओहळ प्रकल्पात पहिल्यांदाच साठलेल्या ३० टक्के पाण्यामुळे मन भरून आलं. या प्रकल्पाच्या रूपाने उत्तूर विभागातील जनतेचे पांग फेडण्याची संधीच परमेश्वराने मला दिली, अशी कृतज्ञतेची भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागामुळे आणि अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाला आला, अशी भावनाही श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केले. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या प्रकल्पाबद्दल महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा कृतज्ञतापर सत्कार केला. यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कृष्णा खोरे लवादाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याचे एक थेंबही पाणी गेल्या दहा वर्षात अडवले नव्हते. आंबेओहळ प्रकल्पाच्या रूपाने हे पाणी अडविण्यात यश मिळाले. आंबेओहळच्या शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे वचन मी दिले होते. त्यासाठी सोमवारपासून महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावून उर्वरित पुनर्वसन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, जलसंपदा विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्मिता माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सौ. अश्विनी जिरंगे आदी अधिकारी उपस्थित होते. सहा हजार हेक्टर सिंचन क्षमता….. या प्रकल्पाची सहा हजार हेक्टर सिंचन क्षमता आहे. १,२५० एमसीएफटी पाणी या प्रकल्पात अडविले जाणार आहे. सातपैकी सहा कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे पूर्ण झाले असून एका बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित पुनर्वसन वाटपासाठी ३८ हेक्टर जमिनीची गरज आहे, त्यापैकी २२ हेक्टर जमीन शिल्लक आहे. अधिकाऱ्यांकडून जमिनीची गुणवत्ता तपासावयाची आहे. ३५ शेतकऱ्यांची जमीन मागणी असून ३१ शेतकऱ्यांनी पॅकेज मागणी केलेली आहे. परंतु; महसूल विभागाने वारंवार पत्र लिहूनही ते लोकच आलेले नाहीत. त्यामुळे करारनामे करण्यामध्ये अडचणी येत आहेत. ———————————————– Attachments areaReplyForward